मानवी साखळीद्वारे एलआयसी कर्मचाऱ्यांचा विश्वशांतीचा संदेश
नागपूर, ( दि.१ जुलै २०२६ ) आम्हाला विनाशकारी युद्ध नको, शांतता हवी हा मानवतेचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठी एलआयसी कर्मचाऱ्यांच्या वतीने बुधवारी सायंकाळी कस्तुरचंद पार्कसमोरील एलआयसी मुख्यालय ते ओरिएंटल बिल्डिंगपर्यंत सुमारे एक किलोमीटर लांबीची भव्य मानवी साखळी उभारण्यात आली.
अखिल भारतीय विमा कर्मचारी असोसिएशनच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नागपूर डिव्हिजनल एलआयसी कर्मचारी युनियनतर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एलआयसी कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत गळ्यात युद्धविरोधी संदेशांचे फलक परिधान केले आणि जागतिक शांतता, बंधुता व मानवतेचा संदेश दिला.
सध्याच्या जागतिक परिस्थितीत युद्धामुळे होणारी मानवी, आर्थिक व सामाजिक हानी लक्षात घेता शांतता, संवाद आणि परस्पर सहकार्य हाच शाश्वत विकासाचा मार्ग असल्याचे या मानवी साखळीच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले. या उपक्रमाचे नेतृत्व ज्येष्ठ कामगार नेते रमेश पाटणे, टी.के.चक्रवर्ती, अनिल ढोकपांडे, शिवा निमजे, वाय.आर.राव, धनराज डोंगरे आणि पी.व्ही.मिलिंदकुमार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राजेश विश्वकर्मा, विवेक जोशी, हिना जिभकाटे, अभय पांडे, राजेश खंडेलवाल, अभय पाटणे, प्रीती पात्रे, संदीप लातूरकर, नरेंद्र उमाळे, लक्ष्मण मौंदेकर, नरेश अडचुले, मुकेश जुमडे, रवि बन्नागरे, राजेंद्र जाधव, सलील मुळे, सारंग मास्टे, प्रकाश बोकडे, अतुल ठाकरे, मिलिंद पवनीकर, देविदास रायपुरकर, वैदेही मोहोरकर, रचना पुराणिक, तुषार मेंदवाडे, राजेश चलपे, शिला झाडे, अरविंद मानवटकर, ओंकार कोहाड, दिवाकर भेंडे, अशोक कालभोरे आदींनी परिश्रम घेतले.

































































































































































































































































































































































































































































































